एकीकडे देशात करोना संकट असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांची भर पडली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलेला असताना त्रिवेंद्र सिंह यांनी अजब वक्तव्य केलं आहे. एकीकडे लोकांचे मृत्यू होत असताना आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झालेला असताना त्रिवेंद्र सिंह यांनी करोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

“करोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार”; भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. “हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी ट्विटरला त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडीओही शेअर केला आहे.

त्रिवेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले –
त्रिवेंद्र सिंह यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना करोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असं मत व्यक्त केलं आहे. सोशल नेटवर्किंगवर त्रिवेंद्र सिंह यांचं हे वक्तव्य सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झालं आहे. म्युटेड करोना विषाणूसंदर्भात बोलताना त्रिवेंद्र सिंह यांनी करोना हा सुद्धा विषाणू असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं.

“तसं पाहिलं तर करोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. बाकी जीवांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आपण (मनुष्य) स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत. मात्र त्यामुळेच तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवतोय,” असं त्रिवेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. करोना विषाणूपासून वाचण्यासाठी काय करावं लागेल यासंदर्भातही त्रिवेंद्र सिंह यांनी भाष्य केलं आहे. आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी या विषाणूच्या पुढे जावं लागणार आहे, असं त्रिवेंद्र सिंह म्हणाले आहेत.