सरकार अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत का करत नाही? आम्ही तुमच्याकडे भीक मागतो आहोत का? असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. कोल्हापुरातील मुदाळ या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावणारं सरकार नसेल तर काय होतं हे आपण अनुभवतो आहोत असेही अजित पवार म्हटले आहेत. शेतकऱ्यांना मदत न करणारं दळभद्री सरकार उलथवून टाका असंही अजित पवारांनी

एवढंच नाही तर सध्याचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचीही टीका अजित पवार यांनी केली. लाखांचा पोशिंदा सुखी नाही, आया-बहिणी सुरक्षित नाहीत. कुपोषणाने डोकं वर काढलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असलं दळभद्री सरकार उलथवून टाका असं आवाहनच अजित पवार यांनी केलं. राज्यात वाढलेल्या गुन्हेगारी बाबतचा मुद्दा अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आणि अश्विनी बिंद्रे या महिला पोलीस अधिकाऱ्याची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यानेच हत्या केली ही घटना जनतेसमोर मांडली.

डान्सबार बंदी उठवून हे सरकार संसार उध्वस्त करु पहात आहे याचा जाब विचारण्यासाठीच ही परिवर्तन यात्रा असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले. साडेचार वर्षांत साडेचार लाख कोटीचे कर्ज या राज्यावर केले आहे आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत पाच लाख कोटीपर्यंत जाईल. एवढा कर्जाचा डोंगर या भाजप वाल्यांनी उभा केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. हे सरकार फक्त उद्योगपतींचे आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.

विधानसभेत जे केले ते पुन्हा करु नका पक्ष देईल तो उमेदवार निवडून द्या. कर्जबाजारीपणातून बाहेर काढायचे असेल तर बदल हा केलाच पाहिजे असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले. इतके दिवस लोकांना जातीजातीमध्ये वाटले आणि आता देवांची जात शोधण्याचा प्रयत्न भाजपवाले करत आहेत. अरे काय चाललंय या राज्यात असा संतप्त सवालही अजितदादा पवार यांनी केला.

शरद पवार आपले नेते आहेत. दिल्लीच्या राजकारणात एक एक खासदार पवारांना साथ देण्यासाठी निवडून दिला पाहिजे. समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी होवू नये यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. एकदा उमेदवार दिला की त्याचे काम इमानेइतबारे केले पाहिजे. राज्यावर फार मोठा अन्याय होत आहे हे लक्षात घ्या असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.