राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात झाली आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. युती करायची तर करा, लोकांना का फसवता? असा सवाल यावेळी छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

‘अमित शाह यांनी पटक देंगे म्हटल्यावर बाळासाहेबांनी अशी लाथ मारली असती, की ते मुंबईत परत आले नसते’, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना भुजबळांनी राफेल मुद्द्यावरुन सरकारला टार्गेट केलं. यांची डिग्री फेलं, लग्न फेल, घर फेल, चाय फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटाबंदी फेल, मेक इन इंडिया फेल आणि आता राफेल. अनिल अंबानी यांनी खेळण्यातले विमानही कधी बनवलं नाही आणि त्यांना कंत्राट दिलं असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार जयदेव गायकवाड, आदींसह पक्षाचे इतर सर्व नेते उपस्थित होते.