शिवसेनेने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. किती दिवस तळ्यात मळ्यात करायचे याला सीमा असते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी कधीच कमळाबाईपासून फारकत घेतली असती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून यात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘सामना’मधून सातत्याने भाजपावर टीका केली जात आहे. शिवसेनेने आता निर्णय घेतलाच पाहिजे. किती दिवस तळ्यात मळ्यात करावे याचीही सीमा असते. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी कधीच भाजपाशी युती तोडली असती, असेही त्यांनी सांगितले.

राजकीय भवितव्याबाबत भुजबळ म्हणाले, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र, शेवटी सर्व निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीर मतदारसंघात सर्वेक्षण करुन, परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. त्यामुळे शरद पवारच योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी आणि मतदारसंघनिहाय आढावा घेतला होता. नाशिक किंवा धुळे मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लढावे, अशी दोन्ही जिल्ह्य़ांतील नेत्यांची मागणी होती. पण स्वत: भुजबळ राज्याच्या राजकारणातच राहावे या मताचे आहेत. भुजबळ हे लोकसभा लढणार नाहीत. गेल्या वेळी नाशिक मतदारसंघातून भुजबळांचा पराभव झाला होता.