अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत तिनं मुंबईला रक्ताचं व्यसन लागल्याचं म्हटलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी कंगनावर संताप व्यक्त केला.

“देशाला अर्थपुरवठा करणाऱ्या, सर्व जाती-धर्म व भाषेतच्या लोकांना सामावून घेणाऱ्या आणि पुष्कळ जणांच्या जीवनाला अर्थ मिळवून देणाऱ्या मुंबईविषयी व्यर्थ बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. मुंबई व महाराष्ट्राच्या विरोधात स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार नाही,” असं म्हणत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यांची ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाली होती कंगना?

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली.

गुंडांपेक्षा पोलिसांची भीती

“मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज,” असं कंगना म्हणाली होती.

मुंबईला रक्ताचं व्यसन

” सुशांत आणि साधुंच्या खुनानंतर आता प्रशासनानवरच्या माझ्या मतानंतर माझ्या पोस्टरला चप्पल मारण्यात आल्या. मुंबईला आता रक्ताचं व्यसन लागलं आहे असं वाटतंय,” असं कंगना म्हणाली.