राज्य सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले असून मंत्र्यांनीही लाजा सोडल्या आहेत. १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले, ९० हजार कोटींचा भ्रष्टाचार यांनी केला. याची न्यायालयानी चौकशी व्हावी अशी मागणी करत भ्रष्टाचाराचे आरोप खोटे निघाले तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारल दिले. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते. मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. भाजपाच्या महामेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राष्ट्रवादीची दहशत दिसली. ज्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना पाणी प्यावे लागले. मुख्यमंत्र्यांनी पवार साहेबांच्या वयाचे भान तरी ठेवायला हवे होते, असे त्यांनी म्हटले. भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशात नवे प्रश्न उपस्थित करत आहे. मूलभूत प्रश्नांना बगल देत भलत्याच चर्चा रंगवत आहेत. या सरकारला घरी बसवल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. सरकारमधील मंत्र्यांनीही लाजा सोडलेल्या आहेत. १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. त्याची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी करत हे आरोप खोटे निघाले तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या, असे आव्हान त्यांनी दिले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपावर टीका केली. जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न उभे राहतात, तेव्हा शरद पवारच धावून येतात. डिजिटल इंडिया झालाच पाहिजे पण केवळ त्याने पोट भरत नाही ते काम फक्त शेतकरीच करू शकतो, असे त्या म्हणाल्या.