अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील आता कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

“याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते. एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते,” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाली होती कंगना?

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली.

गुंडांपेक्षा पोलिसांची भीती

“मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज,” असं कंगना म्हणाली होती.