माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने माण तालुक्यातील नरवणे, वाघमोडेवाडी व खटाव तालुक्यातील मांडले आदी गावांचा दौरा केला. दरम्यान, पवार यांनी अवघ्या एका तासांत दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच कोटींचा निधी मिळवून दिला. वॉटरकप स्पर्धेतील सहभागी विविध गावांना भेट देताना जलसंधारणाच्या कामांसाठी सरकारवर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पवार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक भागाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. कोकणातील काजू, बदाम आणि आंबा, ठाण्यात उद्योगधंदे, बारामती-फलटण-कोल्हापूरला साखरेची कारखानदारी आहे. पण माण-खटाव दुष्काळाच्या छायेत आहे. या गावांची ही ओळख पुसण्याचा प्रयत्न माणदेशी जनता श्रमदानातून करीत आहे. तुमच्या घामाची काळजी आहे. वर्गणी गोळा करुन मेहनतीच्या जोरावर गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सहभागी झालात ही आनंदाची गोष्ट आहे. राजकारणातील मतभेद आणि संघर्ष बाजूला ठेवून गावाचा विकास करण्यासाठी आपण काम सुरु केले आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे पवार म्हणाले. या कार्यक्रमास माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रणजित सिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रभाकर घारगे आदी उपस्थित होते. एक फोन अन् क्षणात निधी.. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील जलसंधारणाच्या कामांसाठी अवघ्या तासाभरात पाच कोटींचा निधी मिळवून दिला. गेल्या वर्षीही त्यांनी दोन्ही तालुक्यातील गावांना खासदार फंडातील एक कोटींचा निधी दिला होता. सातारा जिल्हा सहकारी बँक, सातारा जिल्हा परिषद, पुणे आणि मुंबईच्या काही संस्थांनी शरद पवारांच्या शब्दावर माण- खटावच्या लोकसहभागातील जलसंधारणासाठी निधी देण्याचे जाहीर केले. आज वॉटरकप स्पर्धेतील सहभागी विविध गावांना भेट देताना जलसंधारणाच्या कामांसाठी सरकारवर अवलंबून न राहता मदत करण्याची ग्वाही दिली. सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना फोन करुन बॅंकेतर्फे या कामासाठी मदत करण्याविषयी सांगितले. शिवेंद्रराजेंनीही तात्काळ एक कोटींची मदत करण्याची तयारी दाखविली. सातारा जिल्हापरिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही पवार दीड कोटींचा निधी जलसंधारणासाठी देणार असल्याचे सांगितले. गाडीत बसल्याबसल्या शरद पवार यांनी पुणे आणि मुंबईच्या काही संस्थांना फोनवरुन दुष्काळी माण, खटावमधे सुरु असणाऱ्या जलसंधारण कामांना मदत करण्याची विनंती केली. त्या संस्थांनीही तात्काळ दोन ते अडीच कोटींची मदत करण्याचे मान्य केले. शरद पवार यांनी गाडीत बसून तासाभरातच पाच कोटींचा निधी उभा करुन खऱ्या अर्थाने हजारो श्रमदात्यांचा उत्साह वाढविला.