महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल ( दि. 1 ऑगस्ट) निधन झालं. राजेश टोपे यांच्या आईच्या निधनामुळे टोपे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्रीच टोपे यांची घरी उपस्थिती दर्शवत दुखात सहभागी झाल्या. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत भावूक पोस्ट लिहिली आहे. 'सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबीयांचे सांत्वन करताना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो' अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवारांची फेसबुक पोस्ट - सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबियांचे सांत्वन करतांना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. माझे दिवंगत सहकारी व मित्र कर्मयोगी अंकुशराव टोपे यांना शारदाताईंनी आयुष्यभर निष्ठेने साथ दिली. अंकुशराव टोपे यांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहिल्या. त्यांचे सुपुत्र आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी महाराष्ट्राची आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीतेने हाताळताना आपल्या मातोश्रींच्या आरोग्याचीही अखेरपर्यंत योग्य काळजी घेतली. माझे कुटुंबीय व पक्षाच्या वतीने दिवंगत शारदाताई टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! अशी पोस्ट करत शरद पवारांनी अंकुशराव टोपे यांच्या आठवणींना उजाळा दिला त्याशिवाय राजेश टोपे यांच्या कामाचे कौतुकही केलं. शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमीट करण्यात आले होते. काल रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. करोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. “आईला हृदयविकाराचा आणि मूत्रपिंडाचा आजार होता. एक वर्षाचा असताना तिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. रोज सकाळी तिची भेट घेतो. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा भेटतो. आईची काळजी घेण्यासह राज्याला गरज असताना कार्यरत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे”, असे टोपे यांनी त्यांच्या आईची प्रकृती गंभीर झाली होती त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.