पीएसयू बँकांचे भाजपाने याआधीच विलिनीकरण करून ही संख्या दहावर आणली आहे. आता भाजपाचा डोळा ६ प्रमुख पीएसयू बँकाच्या निर्गुंतवणुकीकरणावर आहे, असा आरोप राष्ट्रवादीने भाजपावर केला आहे. या बँकांचं खासगीकरण करू नका, या बँका विकू नका, असं आवाहनही राष्ट्रवादीने केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था देण्याचे आश्वासन आणि स्वप्न दाखविणारी भाजपा सरकार आता देशाची संपत्तीचा लिलाव करीत आहे. ही राष्ट्र संपत्ती अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे निर्माण झाली आहे आणि अजूनही बहुसंख्य ठेवीदारांचा सरकारी बँकांवर विश्वास आहे.

नोटबंदीचा चुकलेला निर्णय आणि जीएसटीची नियोजन शून्य अंमलबजावणीमुळे आपली अर्थव्यवस्था आधीच उध्वस्त झाली आणि आता करोना साथीने त्याला पार खोलवर गाढून टाकले आहे. बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आता सर्वांनाच जाणवत आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास यासारख्या मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भाजपा सरकारने भावनिक विषयांवर आपली भूमिका बजावल्या आहेत, असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.