सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा फडकला असून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत. या विजयाबरोबरच सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या एका वाक्याची आठवण विरोधकांना करुन दिली जात आहे. ‘टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’ या वाक्याचा आज प्रत्यय आला असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांकडून सांगितलं जात आहे.  सांगली मनपावर राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा महापौर बसल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय.

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते. राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांनी विजय मिळवला.

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली मात्र ती अखेर व्यर्थ ठरली असल्याचे समोर आले आहे.