राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणुकांची लगीनघाई झाल्याचेच दिसून येते आहे. कारण साताऱ्यातील पाटणमध्ये बोलताना ते म्हटले की महिन्याभरात माझं लग्न आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका. असं उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पहात म्हटले तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लग्न हा शब्द त्यांनी भाषणात निवडणुकीच्या अनुषंगानेच वापरला आहे. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने उदयनराजे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आपल्या भाषणात उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरुन कौतुक केले. महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री लाभला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेण्याचे धाडस सत्तेत असताना दाखवले आहे तसे कोणीही दाखवले नाही असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. लोकनेते म्हणावेत असे खूप कमी नेते आहेत, समाजाची जाणीव असणारे खूप कमी नेते सध्या उरले आहेत असेही उदयनराजेंनी म्हटले आहे. शंभूराजे देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले एकाच मंचावर होते.

याच कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी शंभूराजे देसाईंचेही कौतुक केले. महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक साताऱ्यात उभारण्यात आलं त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. याच कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी सरकारचं भरभरुन कौतुक केलं.  शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.