भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजपा सत्तास्थापनेसाठी तयार असल्याचं वक्तव्य केलं. यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात येक आहे. हे शहाणपण आधी सुचलं नाही का? असं म्हणत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुनगंटीवारांवर हल्लाबोल केला.

तर सुधीर मुनगंटीवार यांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पडत आहेत, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टोला हाणला. “भाजपाची इच्छा आहे, परंतु शिवसेना त्यांच्यासोबत जाईल की नाही हे शिवसेनेला विचारलं पाहिजे,” असं मलिक म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “हे शहाणपण यापूर्वी का सुचलं नाही? असं म्हणते भाजपा सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचं मलिक म्हणाले. मी येतो अशी भाजपाची इच्छा आहे. त्यांना सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय शिवसेनेचा आहे,” असं ते म्हणाले. तसंच शिवसेनेनं कमळाबाईला सोडलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न
“सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्याचा काही अर्थ नाही. तीन पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या बोलण्याप्रमाणे काहीही होण्याची शक्यता नाही. हे सरकार राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं काम करत आहे,” असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले होते मुनगंटीवार?

”शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आताही शिवसेनेनं प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून अडचण नाही. ‘देर आये दुरूस्त आये, सुबह का भूला श्याम को आया’ असं आम्ही समजू,” असं मुनगंटीवार म्हणाले होते. त्याचबरोबर “मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही. पण, समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपाची भूमिका आहे,” असं सांगत त्यांनी मनसेबाबत भाजपाचं मत अनुकूल असल्याचंही अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं.

दिल्लीच्या मातोश्री शक्तीशाली झाल्या 
शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीविषयी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “शिवसेनेला काँग्रेसनं पाठिंबा देणं हे २१व्या शतकातील आश्चर्यच आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते सत्तेत गेले. मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

असा इतिहास आहे
महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला. “भिन्न विचारांचे सरकार दीर्घकाळ टिकत नाही, असा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. या सरकारची स्थिती व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासारखी आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.