मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली. "उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. शरद पवारांनी यासाठी होकार दिला आहे," असं नवाब मलिक यांनी सांगितलं. अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय "सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शेवटी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवणे गरजेचं आहे. राजीनामा दिला, विषय संपला," असंही नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने गृहमंत्रीपदी कोणाचा वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नाही. मात्र उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याचा सन्मान ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे. सीबीआय चौकशीदरम्यान पदावर राहणे योग्य नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी पक्षासमोर मांडली. (१/२) — NCP (@NCPspeaks) April 5, 2021 नवाब मलिक यांना गृहखात्याचा पदभार कोणाकडे असेल असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्र्यांकडे त्या खात्याची जबाबदारी असते. नंतर मुख्यमंत्री ही जबाबदारी दुसऱ्याकडे देतील. तीन पक्षांचं सरकार असताना चर्चा करुन जो निर्णय होईल तो स्वत: मुख्यमंत्री लोकांना सांगतील". अनिल देशमुखांचं ट्विट - न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असल्याने गृहमंत्री पदावर राहणं मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे असं अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितलं आहे.