आगामी २०१९च्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला असून काँग्रेसला 50-50 टक्के जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 50-50 टक्के जागांवर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव राहुल गांधींसमोर ठेवला आहे.

राज्यात दोन्ही पक्षांची समान ताकद असल्याने त्याप्रमाणे जागावाटप व्हावं असं शरद पवारांनी म्हटलं असल्याचं समजत आहे. दरम्यान राहुल गांधींनी अद्याप निर्णय दिलेला नाही. राहुल गांधी नेमका काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली असून आज यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षाची कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीला शरद पवारदेखील उपस्थित होते.

विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला. पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल. राजकारणातील बदल स्विकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही. उलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले, २००४मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना इंडिया शायनिंग या मोहिमेद्वारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करताही निवडणूक जिंकलो होतो. त्यानंतर एकत्र येत मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले होते. त्यामुळे हे जरूरी नाही की आधीच पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जावे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसोबत आहेत. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्षही आमच्यासोबत आहे. त्याचबरोबर, मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपाला सातत्याने विरोध दर्शवला आहे. मात्र, या पक्षांशी एकत्र येण्याबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.