‘निर्धार परिवर्तनाचा’ ही भूमिका घेवून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आणि महाडच्या चवदार तळयाच्या परिसरात पहिली सभा घेवून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ९ जानेवारीपासून परिवर्तन यात्रा सुरु करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारच्याविरोधात राज्यभर हल्लाबोलच्या माध्यमातून रान उठवले होते. राज्यभर राष्ट्रवादीने हल्लाबोलच्या माध्यमातून भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. आता परिवर्तन यात्रा काढून केंद्र व राज्यसरकाच्या कारभाराचे पुन्हा एकदा वाभाडे काढत तो कारभार जनतेपर्यंत पोचवला जाणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश लोकांसमोर मांडून महाराष्ट्रात सर्व समाज संघटीत करुन भाजपा-सेनेच्याविरोधात ही परिवर्तनाची यात्रा काढणार आहोत असेही पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व समाजाला आणि सर्व घटकाला नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजपाच्या सरकारने जो भ्रमनिरास केला आहे. ज्यांना फसवलं आहे, त्या सर्वांच्यासमोर जावून ही भूमिका मांडणार असल्याचा आमचा महत्वाचा भाग आहे, असेही पाटील यांनी सांगितले.