मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आज (दि.31) पार पडली. भाजपा-शिवसेना या जातीवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी मोठी रणनीती आखली गेली आहे. लवकरच याबाबतची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील करतील, अशी माहिती पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी दिली.

सध्या अनेकजण इतर पक्षात जात आहेत. ज्यांना स्वतःचे घर वाचवायचे होते ते पळून गेले आहेत. या पळपुट्यांमुळे अनेकांना पुढे येण्याची संधी मिळत नव्हती, आता तळागाळातील लोकांना संधी मिळेल असं हेमंत टकले म्हणाले. यावेळी बोलताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही आमदार हेमंत टकले यांनी कडाडून टीका केली. ही जनआदेश यात्रा नसून गिरीश महाजन आदेश यात्रा आहे असेही आमदार हेमंत टकले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन थैल्या घेऊन फिरतात. चौकशीचा ससेमिरा लावला जातो, धमक्या दिल्या जातात. राज्यभरात सत्ताधाऱ्यांतर्फे फंदफितुरीचे राजकारण केले जात असल्याची खंत आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले आणि पक्षाचे प्रदेश इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.