आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी, समाजातील तरुण पिढीशी आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवं असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. शरद पवारांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. यावेळी अभीष्टचिंतन कार्यक्रमात त्यांनी समर्थकांशी संवाद साधला.

“माझा जन्मदिवस माझ्या लक्षात राहत नाही. परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस १३ डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर आहे,” याची आठवण शरद पवार यांनी सांगितली. “माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. १९३६ साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचं शिक्षण व्हावं असा तिचा आग्रह होता,” अशी माहिती शरद पवार यांनी सभागृहात दिली.

आणखी वाचा- …म्हणून शरद पवार खोटं बोलले होते

“सार्वजनिक जीवनात यश मिळतं. संकटं येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस,” आहे असेही शरद पवार म्हणाले. “आज जो धनादेश दिला तो वेलफेअर ट्रस्टच्या वतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल,” असंही शरद पवार यांनी सांगितलं. “शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार,” असं आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.