बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्र होणार असून सध्याची आकडेवारी पाहता बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.

“मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर पहिल्यांदाच शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अन्वय नाईक कुटुंबीयांसोबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर शरद पवारांनी केला खुलासा; म्हणाले…
“….तुमच्या वयाला शोभत नाही,” शरद पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला सल्ला

“आज जरी बदल झाला नसला तरी हळूहळू बदल होत असल्याची वाट दिसू लागली आहे. नितीश कुमार यांना अजिबात फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे. भाजपाची संख्या वाढली, पण नितीश कुमार यांची संख्याही कमी झाली आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं. “तेजस्वी यादव यांना जितके मोकळे हात मिळतील तेवढं चागलं असं मत होतं, त्यामुळे तिथे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

अमेरिका निवडणुकीवर भाष्य
“जगातील मोठी लोकशाही म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही असो, जागा दिली नाही म्हणून नाउमेद होऊन टोकांची भूमिका घेऊ नये. हा लोकांचा अधिकार आहे. निर्णय इतका स्वच्छ लागल्यानंतर अशा प्र्कराची वक्तव्यं करणं त्यांच्या वयाला शोभत नाही,” असं शरद पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उल्लेखून म्हटलं. मी १४ वेळा निवडणुकीला उभं राहिले, कधी पाडलं नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

अर्णब प्रकरणावरुन राज्यपालांना टोला
राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं असा टोला शरद पवारांनी लगावला.