शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल
“एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”

“राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

“महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत असून राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं. राज्यात आज जे सरकार आहे त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.

“सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु,” प्रताप सरनाईकांविरोधातील कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा
प्रताप सरनाईकांवरील ईडीच्या कारवाईवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांना यावेळी रावसाहेब दानवे यांनी तीन महिन्यात भाजपाचं सरकार येणार असल्याच्या दावा केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हतं असा टोला त्यांनी लगावला. “रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. पण त्यांचा हा गुण मला माहित नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ‘ज्योतिषी’ म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु- संजय राऊत</strong>
“काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

फडणवीसांची प्रतिक्रिया-
“ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल”.