महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. "कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच सांगत असतो. त्यात काही नवीन नाही. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्दत आहे. त्याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा- शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र, उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावरुन टोला; म्हणाले… "स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायच्या की स्वतंत्र हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. जो काही निर्णय असेल तो एकत्रितपणे घेतला जाईल," असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. "आपल्याला राज्यात स्थिरता हवी आहे. राज्य नीट चाललं पाहिजे. भाजपाला बाजूला करण्यासाठी सगळे एकत्र आल्याने लोकांना चांगली फळं मिळालेली दिसत आहेत. याच पद्दतीनं राज्य करा," असा सल्ला यावेळी शरद पवारांनी दिला. आणखी वाचा- “राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये,” कांदा प्रश्नावर शरद पवारांनी घेतली बैठक पंकजा मुंडेच्या बैठकीतील उपस्थितीवर भाष्य - "भाजपा जवळ येऊ पाहत आहे यामध्ये काही सत्य नाही. पंकजा मुंडे या सहकारी साखर कारखान्यांची जी संघटना आहे त्या संघटनेत एका कारखान्याच्या प्रमुख म्हणून संबंधित आहेत. काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटवर साखर कारखान्यांसंबंधी चर्चा होती आणि त्या चर्चेला प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. यामध्ये राजकारणाचा काही विषय नाही. काही लोकांना चिंता वाटत असेल तर त्यांना त्यांनी सूचना केली आहे," असं शरद पवारांनी सांगितलं. मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया- "मला नेमका काय गोंधळ उडाला याची कल्पना नाही. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टात खूपदा मोठ्या वकिलांच्या वेळा अॅडजस्ट केल्या जातात. वकील सुरुवातीला नव्हते पण त्यानंतर अर्ध्या तासाने ते आले. युक्तिवाद झाला..चर्चा झाली. न्यायाधीशांनीही विषय़ घेतला, त्यावर निर्णय दिला. त्यामुळे त्याच्यावर टिका टिप्पणी करण्याची गरज नाही," असं शरद पवारांनी सांगितलं आहे.