राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण उद्या दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत यांनी शुक्रवाारी आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहून पाहुणचार स्विकारणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे”. कार्यकर्त्यांना आवाहन करताना शरद पवार यांनी, “सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,” असं म्हटलं आहे.

“त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी, “ईडीने माझ्यासंदर्भात शिखर बँक प्रकरणात जो गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात मी माझी स्वतःची भूमिका अशी आहे की मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार. नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे,” असं म्हटलं होतं.

तसंच संपूर्ण महिनाभर मी निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे. त्यामुळे माझं वास्तव्य मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला होता.

“दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही, अशी कोपरखळीही पवार यांनी कुणाचं नाव न घेता मारली होती. अशा प्रकारची कारवाई होण्याचा माझ्यावरील हा दुसरा प्रसंग असे त्यांनी सांगितले. १९८० मध्ये अमरावतीमध्ये एका शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मला अटक करण्यात आलीली होती मात्र माझ्या बाजुनं निकाल लागला व प्रश्न शिल्लक राहिला नाही,” असंही ते म्हणाले होते