सगळीचं रसायनं चांगली नसतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मारला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. हा रसायनाचा विकास असल्याचं मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र रसायनामुळे चांगलंच होत असं नाही, काही रसायनांमुळे अस्तित्वही संपतं. हे रयासनाची पावडर तुमच्यावर टाकत आहेत अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

माणसं साफ करणारी कसली वॉशिंग पावडर भाजपाकडे ? आहे अशी विचारणा यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली. देशात आम्ही सगळीकडे तीन नंबरला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता त्यांनी मंदीतला क्रमांक सांगितला की विकासामधला हे माहिती नाही ? असा टोलाही त्यांनी लगावला.

नाशिकमधून १० हजार नोकऱ्या गेल्या असल्याची टीकाही त्यांनी केली. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांनी बायोडेटा गोळा करा आणि माझ्याकडे द्या, मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवते. बेरोजगारी मुक्त आहे तर मग सगळ्यांना नोकऱ्या देऊन टाका असं मी त्यांना सांगणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं. सगळी आश्वासनं भाषणापुरतं असून सर्वसामान्य माणसं भरडली जातात असंही त्यांनी सांगितलं.

पक्ष बदलणाऱ्यांवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी पक्ष बदलणं मोबाइलच्या सीम कार्डसारखं झालं आहे, जो जास्त बोलायला देणार त्याचं सीमकार्ड वापरायचं अशी टीका केली.