जे लोक सारखं सरकार पडणार म्हणतात ते ऐकताना मला गंमत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे. “करायचा तेवढा आवाज करा, पडलं तर बघू काय करायचं. आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आम्ही आहोत कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही,” असंही त्या म्हणाल्या आहेत. इंदापूरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करताना त्या बोलत होत्या.

“लोकं सारखं म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गमंत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा. सरकार पडलं तर बघू काय करायच ते…हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे,” असं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- महाविकास आघाडी सरकार जनमताविरुद्ध असतं तर…; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर शरसंधान

सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावरही भाष्य केलं. नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी ते लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेणार आहेत. “आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल?,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. “देशाचे प्रधानमंत्री वेगळ्या विचाराचे असले तरी त्यांना आपलं पुणे हवंहवंसं वाटतंय,” असा टोला त्यांनी लगावला.