वसंत मुंडे

मौजच्या डॉ. विशाल डावकर यांचे संशोधन; अमेरिकेच्या संशोधन नियतकालिकेत दखल

कापसासह, सूर्यफुल आणि कडधान्याच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळी कीटकामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या किडीला मारण्यासाठी बेसुमारपणे रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. त्याचे दुष्परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. जगभरातील संशोधक या कीटकाच्या नियंत्रणासाठी काम करत असताना कडुनिंबापासून बोंडअळी कीटकावर नियंत्रण मिळू शकते, असे जैविक संशोधन दृष्टिक्षेपात असल्याचा दावा तरुण संशोधक डॉ. विशाल डावकर यांनी केला आहे. त्यांचे हे संशोधन अमेरिकेतील संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाल्याने या संशोधनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यतील मौज येथील तरुण संशोधक डॉ. विशाल डावकर हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे (सीएसआयईआर) येथे बोंडअळी कीटक नियंत्रण यावर संशोधन करत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील कापूस, सूर्यफुल, डाळी, धान्य यासह जगभरातील तीनशेपेक्षा जास्त वनस्पतींना नुकसान करणाऱ्या बोंडअळी या कीटकामुळे शेतकरी हैराण आहे. पारंपरिक पद्धतीने या बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महागडय़ा रासायनिक कीटकनाशकांचा अलीकडे बेसुमार वापर केला जात असल्याने ही कीटकनाशके मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठीही घातक ठरत असल्याचे समोर आले आहे. या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वषार्ंपासून जगात वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. विशाल हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी बोंडअळी किडीच्या चयपचन आणि वाढीसाठी जगभरातील संशोधनाचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा शोध कडुनिंबापाशी येऊन थांबला आहे. कडुनिंबापासून वेगवेगळी कीटकनाशके तयार केली जातात. कडुनिंबातील अझादिराक्तिन रेणू कीटकांच्या वाढीला नियंत्रित करण्यासाठी अनेक प्रकारे काम करतो हे लक्षात आल्यानंतर हा रेणू बोंडअळीला खाऊ घातला तर ती मरते, हेही प्रयोगातून समोर आले आहे. जगभरातील संशोधकांकडून सुरू असलेल्या संशोधनाचा अभ्यास करून त्यांनी कडुनिंबापासून बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्याबाबतच्या संशोधनाला गती दिली.

कडुनिंबाचे झाड हे पिकावरील कीटकांना मारण्यासाठी आणि मानवी आरोग्य सुधारण्यासाठी गुणधर्मी म्हणून ओळखले जाते. भारतात आणि इतर ठिकाणीही कडुनिंबाच्या झाडामध्ये मिळणारे अझादिराक्तीन घटक हे इतर कोणत्याही झाडात दिसत नाहीत आणि हा घटक नसíगक पद्धतीने कीटकांच्या वाढीला प्रतिबंध करतो. त्यामुळे मागील ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून अझादिराक्तीनचे गुणधर्म समजून घेऊन तो कृत्रिमरीत्या तयार करण्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. मात्र तो प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार करणे शक्य होत नाही. हा घटक तयार झाला तर जैविक पद्धतीने पर्यावरणपूरक कीटकनाशक विकसित करता येऊ शकते.

शेतकऱ्यांना परवडणारे औषध

आता हे संशोधनाने एक पाऊल पुढे टाकले असून जैव सूची विज्ञानाचे तंत्रज्ञान वापरुन बोंडअळीच्या सहा विकारांबरोबर प्रक्रिया घडवून चयापचय झालेले रेणू विकरांची क्रियाकलाप थांबवतात, हे सिद्ध झाल्याने ३५ पेक्षा जास्त रेणूंची संरचना तयार करून असे रेणू तयार करणे दृष्टिक्षेपात आल्यामुळे बोंडअळीवर नियंत्रण मिळवणे जैविक पद्धतीने शक्य होणार आहे. यामुळे स्वस्तात शेतकऱ्यांना परवडणारे औषध उपलब्ध होऊन बोंडअळीच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता वाढली आहे.