शिवभक्तांना सुरक्षितपणे किल्ले रायगडवर जाता यावे. यासाठी रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नवा सुरक्षित आणि वैशिष्टय़ंपूर्ण रोप वे उभारण्याची घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी महाड येथे केली.

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडवर सुरू असलेल्या संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी खा. संभाजीराजे शुक्रवारी गडावर आले होते. या पाहणीनंतर महाड येथे पत्रकार परिषद घेवून त्यांनी ही घोषणा केली.

सध्या रायगडवर जाण्यासाठी उपलब्ध असलेला रोप वे जागेच्या वादामुळे बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब पत्रकारांनी खा. संभाजीराजे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर बोलताना प्राधिकरणाच्या माध्यमातून नव्या रोप वेसाठी पन्नास कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून हा नवा रोप वे गडाच्या वैभवाला साजेसा असा उभारण्यात येईल असे खा. संभाजीराजे म्हणाले.

ह्ती तलावाला पुन्हा गळती लागली असून, या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे. त्यावर भाष्य करताना, या तलावाची गळती काढण्याचे काम केवळ साठ ते सत्तर टक्केच झालेले आहे. ज्या भागातील गळती काढण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कोणतीही समस्या नसून, ज्या भागात काम झालेले नाही, त्याच भागात ही समस्या निर्माण झालेली आहे. ते काम आता सुरू करण्यात आलेले आहे. जर काम योग्य पद्धतीने झाले नसते तर हा तलाव पूर्ण भरला नसता ही बाब देखील त्यांनी निदर्शनास आणून दिली. या कामामध्ये एक रूपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही आणि आपण तो होऊ देणारही नाही. असा विश्वासही खा.संभाजीराजे यांनी यावेळेस दिला.

गडावरील संवर्धन आणि उत्खननाचे काम पुरातत्व विभागामार्फत केले जात आहे. या कामासाठी अकरा कोटी रूपयांचा निधी प्रधिकरणाने पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत केला आहे. मात्र ही कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. या गतीने ही कामे पूर्ण होण्यास पंचवीस वर्षे लागतील. त्यामुळे ही कामे प्राधिकरणामार्फत व्हावीत यासाठी आपण पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करित असल्याचेही खा. संभाजीराजे यांनी सांगितले.

प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या गावांतील रस्त्यांची कामे जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती प्रधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही आर सातपुते यांनी दिली. महाड रायगड मार्गाचे काम योग्य पध्दतीने न करणाऱ्या ठेकेदाराकडून हे काम काढून घेण्यात आले आहे.

त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले असून नवी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहितीही खा. संभाजीराजे यांनी दिली.यावेळी शिवराज्याभिषेक संस्थेचे फत्तेसिह सावंत उपस्थित होते