नांदेड- बिलोली मार्गावरील कासराळी येथे वाहनांची समोरासमोर धडक होऊन एका नवदाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. १९ एप्रिल रोजीच या दाम्पत्याचे लग्न झाले होते. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांमध्येच या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

शिविलग प्रल्हाद कुनके (वय २४) आणि कोमल बालाजी यशवंतकर (वय २०) हे नवविवाहित दाम्पत्य जळकोट येथून नांदेडकडे निघाले होते. मात्र, रस्ता चुकल्यामुळे ते बिलोलीच्या रस्त्याने निघाले. सोमवारी कासराळी येथील पेट्रोल पंपाजवळ टेम्पोने कारला धडक दिली. या धडकेत शिविलग आणि कोमल या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे यात जखमी झाले. शिवराज मंटाळकर, कृष्णा मंटाळकर, सविता बेल्लूरकर अशी जखमींची नावे आहेत.

दाम्पत्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच उदगीर तालुक्यातील त्यांच्या गावी शोककळा पसरली. १९ एप्रिल रोजी लग्न झालेल्या या दाम्पत्याचा संसार अवघ्या तीन दिवसांमध्येच संपल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. या दाम्पत्यावर एकाच चितेवर अग्नी दिला गेला.