पुढील चोवीस तासांत मुंबई आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढे ६ ऑगस्टपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार आहे. दरम्यान, ४ ते ५ ऑगस्टदरम्यान मुंबई, ठाणे उत्तर महाराष्ट्रात याचा जास्त प्रभाव जाणवेल. दरम्यान, मुंबईतील सखल भागात यामुळे पाणी साचण्याची शक्यता असून याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा इशाराही हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.

४ ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचा अधिक प्रभाव आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे ३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुंबईसह मध्य महाराष्ट्रात घाट परिसरासह कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तसेच उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये ४ ऑगस्टच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. सध्या सामान्य स्थिती असली तरी पुढे पाऊस दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्रीय विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे, दक्षिणेकडील मॉन्सूनचा प्रवाहात अरबी समुद्रावर आणि पश्चिम-किनाऱ्यासह उत्तर-दक्षिण वाढ होऊन मॉन्सून अधिक मजबूत होण्याची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.