निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे असे, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

मंगळवारपासूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांना तडाखा बसला आहेच शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि होणार आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा- ‘निसर्ग’ वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

श्रीवर्धन, मुरुडमध्ये वादळाचा प्रभाव अधिक

वादळाचा प्रभाव श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात जास्त असल्याने, अलिबाग येथील एनडीआरएफच्या दोन टिम मुरुडकडे रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १३ हजार ५४१ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात वादळाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांना घरातच राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाला असला तरी दूरसंचार यंत्रणा सुरु आहेत.