मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून आमदार नितेश राणे यांनी "जास्तच हवा भरलेली आज," असं म्हणत टोला लगावला आहे. दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांसह नारायण राणे व त्यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे व नितेश राणे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राज्यासह देशातील राजकारणावर भाष्य केलं. ठाकरे यांच्या भाषणानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका करत इशारा दिला आहे. "बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज. किती आव. 'टाचणी’ तयार आहे. फक्त योग्य वेळ येऊन द्या," असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. बिहार च्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते.. जास्तच हवा भरलेली आज.. किती आव.. 'टाचणी’ तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन दया.. — nitesh rane (@NiteshNRane) October 25, 2020 राणेंबद्दल काय म्हणाले होते मुख्यमंत्री? "प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही," अशी टीका ठाकरे यांनी केली होती.