सध्याच्या कठीण काळात करोनाचा धोका वाढत असताना स्वतःची, परिवाराची आणि समाजाची जास्तीत जास्त काळजी घ्या. निष्काळजीपणा करु नका. त्याचबरोबर राजकारण न करता सगळ्यांना मदत करा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. भाजपाच्या नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपाप्रसंगी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना सध्याच्या परिस्थितीच्या भीषणतेची जाणीव करुन दिली. त्याचसोबत लोकांना मदत करताना आपण स्वतःची, आपल्या परिवाराची काळजीही घ्यायला हवी असा सल्लाही दिला. त्याचबरोबर आपण करत असलेल्या मदतकार्याचा गवगवा न करता निस्वार्थ भावनेने काम कऱण्याचे फायदेही त्यांनी कार्यकर्त्यांना पटवून दिले.

आपल्या भाषणात ते म्हणतात, “राजकारण करु नका. सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड, झेंडे लावले पाहिजेत असं नाही. अशावेळी आपण जर काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही. तुम्ही जे कऱणार आहात, त्याचं क्रेडीट आपोआप तुम्हाला आणि पार्टीला मिळणारच आहे. मीडियामुळे ते सर्वांपर्यत पोहोचतंच. त्यामुळे आपण आपल्या सेवाकामाचा लोकांना माहिती होणं इथपर्यंत त्याचा प्रचार करणं ठीक आहे. त्याचा फार बागुलबुवा करणं म्हणजे एकच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे आणि चार जण वारंवार त्याच्यासोबत फोटो काढून पाठवत आहेत, असं करु नका. त्याच्यातून आपल्याबद्दलचं इम्प्रेशन वाईट होईल.”

सध्याच्या स्थितीत राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणतात, “आपण सांगतो मनसा सततं स्मरणीयम्, वचसा सततं वदनीयम्, लोकहितं मम् करणीयम् …म्हणजे राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे. हे खऱं राजकारणाचा अर्थ आहे. नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच काही त्याच्यातला भाग नाही. पण मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की समाजाच्या मागे, गरीब माणसाच्या मागे, जात, पंथ, धर्म, पार्टी, पक्ष विसरुन सगळ्यांच्या मागे आपण योग्य प्रकारे मदतीसाठी उभं राहणं हे महत्त्वाचं आहे.”