भारतातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच महाराष्ट्रात या विषाणूचा शिरकाव झाला आहे की नाही यासंदर्भात सरकारी अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. भारताच्या उत्तरेकडील तसेच दक्षिणेतील केरळ राज्यात मागील काही दिवसांपासून हजारोच्या संख्येने पक्षी मृत्यूमुखी पडल्याने एकच खळबळ उडली आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अद्याप बर्ड फ्लूचे एकही प्रकरण आढळून आलेलं नाही, अशी दिलासादायक माहिती राज्यातील वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे.  महाराष्ट्रात अद्याप या विषाणूचा शिरकाव झालेला नाही असं सरकारी अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.

सध्या तरी महाराष्ट्रातील कोणत्याही भागामधून बर्ड फ्लूसंदर्भातील एकाही प्रकरणाची नोंद झालेली नाही, अशी माहिती मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. २००६ साली महाराष्ट्रातील नंदूरबार तसेच धुळ्यामध्ये एच फाइव्ह एन वन विषाणू म्हणजेच बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आलेला. या विषाणूचा संसर्ग झाल्याने पोल्ट्री फॉर्मचे मोठं नुकसान झालं होतं. यावेळेस हजारो पक्षांचा मृत्यू झाल्याने पोल्ट्री उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला होता.

नक्की पाहा फोटोगॅलरी >> India Bird Flu : २५ मुद्द्यांमध्ये जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडलं

पाच राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळला

मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याने पक्षांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये प्रमुख्याने मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळ आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशमध्ये अंडी आणि कोंबड्या विकण्यावर बंदी

मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील प्रशासनाने पुढील १५ दिवसांसाठी कोंबड्या तसेच अंडी विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंदसौरमध्ये अनेक मृत कावळे आढळून आल्यानंतर बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये २३ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान ३७६ कावळ्यांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे १४२ कावळे इंदूरमध्ये मृत्यूमुखी पडलेत. तर दुकानांना १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेल्या मंदसौरमध्ये १०० मेलेले कावळे आढळले होते. आगर-माळवामध्ये ११२, खरगोन जिल्ह्यात १३ तर सीहोरीमध्ये ९ कावळ्यांचा मृत्यू झालाय. इंदूरबरोबरच मंदसौर येथे सापडलेल्या मृत कावळ्यांच्या नमुन्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. या अहवालामध्ये पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूच्या विषाणुमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ज्या ठिकाणी मेलेले कावळे आढळे आहेत तिथे विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री प्रेम सिंग पटेल यांनी राज्यातील आपत्कालीन यंत्रणेअंतर्गत इंदूरमध्ये बर्ड फ्लूसंदर्भातील नियंत्रण कक्ष उभारण्यात आल्याची माहिती दिली आहे.

केरळमध्ये राज्यस्तरावरील आपत्तीची घोषणा

केरळमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. केरळने बर्फ फ्लूची प्रकरणं समोर आल्यानंतर या आपत्तीला राज्यास्तरीय आपत्तीचा दर्जा देत असल्याची औपचारिक घोषणा केलीय. मध्य प्रदेशमधील मंदसौर आणि कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये कोंबड्यांचे मांस आणि अंड्यांची दुकान सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आज केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझा या दोन जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा राज्य सरकाने जारी केला आहे. हिमाचलमधील स्थलांतरित पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तिथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोट्टायम जिल्हा प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार नींदूरमधील एका बदकांच्या पोल्ट्रीमध्ये बर्फ फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळून आले आहेत. येथे १२०० हून अधिक बदकांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलप्पुझा जिल्ह्यातील कुट्टानद येथील काही पोल्ट्री फार्ममध्येही बर्ड फ्लूची प्रकरण समोर आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ फ्लू झालेले पक्षी आढळून आल्याने संसर्ग रोखण्यासाठी ४८ हजार पक्षी मारण्याचे आदेश जारी करेण्यात आले आहेत.

४८ हजार पक्षी ठार करण्याचे आदेश

केरळचे वन्यजीव मंत्री के. राजू यांनी राज्यात बर्फ फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळून आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आठ सॅम्पल्समध्ये विषाणू आढळल्याचे राजू यांनी म्हटलं आहे. बर्ड फ्लू झालेले पक्षी आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्वच पोल्ट्री फार्म आणि पक्षी उत्पादकांच्या पोल्ट्री बाजारांवर, जलाशये तसेच प्रवासी पक्षांच्या निवाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बर्फ फ्लूचे विषाणू आढळून न आलेल्या जिल्ह्यांमध्येही यंत्रणांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझामधील थालावेद्या, इडथ्थावा, पालिपड आणि थाजाकारा पंचायतींच्या हद्दीमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळू आलेत. या ठिकाणी राज्य सरकारने विशेष तुकड्या नियुक्त केल्या आहेत. या परिसराच्या एक किलोमीटर परिघातील सर्व ४८ हजार पक्षी ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पक्षांचा मोबदला देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल असंही के. राजू यांनी सांगितलं आहे.

नक्की पाहा >> करोनाबरोबरच जपानमध्ये बर्ड फ्लूचाही उद्रेक; ११ लाख कोंबड्यांना मारणार

या तीन राज्यांमध्येही बर्ड फ्ल्यू…

केरळ आणि मध्य प्रदेशबरोबरच हरयाणा, राजस्थान आणि हिमाचलमध्येही बर्ड फ्यूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. हरयाणामधील अंबाला आणि पंचकूलाच्या दरम्यान असणाऱ्या बरनाला प्रदेशामध्ये एक लाखांहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यामधील पोंग येथील तलावाजवळ मृतावस्थेत सापडलेल्या पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती समोर आली आहे. झील अभयारण्यामधील एक हजार ८०० हून अधिक स्थलांतरित पक्षी मरण पावले आहेत. राजस्थानमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ५०० हून अधिक पक्षी दगावल्याचे वृत्त आहे.