भौगोलिक व लोकसंख्यादृष्टय़ा प्रचंड मोठय़ा असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविना (सीईओ) सुरू आहे. त्याचा ग्रामीण भागाच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून विकास खुंटल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेला पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी कधी मिळणार, असा सवाल जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते संदीप पवार यांनी उपस्थित केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुरुंदकरांच्या बदलीनंतर आजतागायत ठाणे जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविना सुरू आहे. जिल्हा परिषदेचा गाडा नीटपणे हाकायचा असेल तर पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी असण्याची गरज संदीप पवार यांनी व्यक्त केली आहे.विद्यमान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदेकडे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार आहे. कामवाटप, समितीअंतर्गत होणाऱ्या विकासकामांचे वाटप त्यांनी गत आर्थिक वर्षांत न केल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. पर्यायाने जिल्ह्य़ाच्या एकूण विकासावर त्याचा परिणाम झाला आहे.डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह सर्व सदस्यांनी एकमताने शिंदे यांच्याविरोधात ठराव घेतला होता. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेतही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात भाजप गटनेते संदीप पवार यांनी आक्षेप नोंदवत सभागृहात जोरदार चर्चा केली व त्यांच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनीही केलेल्या सूचनांना लालफितीत अडकवून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनमानीपणे कारभार करीत असल्याचा आरोप संदीप पवार यांनी करून अशा बेजबाबदार अधिकाऱ्याच्या हाती ठाण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्हा परिषदेचा कारभार राहिला तर विकास कसा होणार, असा सवाल पवार यांनी मुख्यमंत्र्यांना व ग्रामविकासमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे व ठाणे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याची मागणीही केली आहे.