राज्यातील ठाकरे सरकार सर्वच मुद्दय़ावर अपयशी ठरले आहेत. सत्तेतील  महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ऑगस्ट -सप्टेंबर पर्यंत हे सरकार कोसळेल, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हे सरकार सत्तेवर असणार नाही. असे प्रतिपादन भाजपा नेते, खासदार नारायण राणे यांनी आज  व्यक्त केले.

मालवण येथील निलरत्न या बंगल्यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे हे बोलत होते. ते म्हणाले,  अभिनेता सुशांत सिंगच्या हत्येचा मुद्दा मागे पडावा. यासाठीच कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याची भाषा शिवसेना करीत आहे. मात्र अशा आंदोलनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोणी आव्हान देण्याची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी आमच्या सोबत यावे. असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.