संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी संभाजी ब्रिगेड संघटना निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी औरंगाबाद इथे याची माहिती दिली. कायद्यानुसार संभाजी ब्रिगेडचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. मी दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर कायदेशीररित्या त्यामध्ये फेरबदल करण्यात आले नाहीत. संघटनेचा लोगो, नाव वापरून राजकीय पक्ष चालवला जात आहे. त्या विरोधात आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे गायकवाड म्हणाले. सध्या राजकीय पक्ष की सामाजिक संघटना या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. राजकीय पक्ष नको अशी ९० टक्के कार्यकर्त्यांची भूमिका होती. मात्र तरीही पक्ष निर्मिती करण्यात आली. देशात लोकशाही आहे. मात्र मराठा सेवा संघात लोकशाही नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मराठा सेवा संघ परिवाराने तयार केलेला शिवराज्य पक्ष राजकारणात यशस्वी झाला नाही. त्याचा अनुभव पाठीशी होता. तरी देखील पक्ष निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकारणासाठी शेतकरी कामगार पक्ष चांगला पर्याय आहे. विचाराशी जुळत्या या पर्यायाचा विचार करावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच येणाऱ्या काळात भाजप शिवसेनेचे सरकार घालवण्यासाठी संघटना रणनीती आखणार असल्याचे ते म्हणाले. जिजाऊ रथ यात्रदरम्यान माझ्यावर तीन हल्ले झाले. मात्र ११७ दिवसात प्रमुख नेते यात्रेकडे आले नाहीत. भांडारकर प्रकरणात देखील कायदेशीर प्रक्रियेत कोणीही विचारलं नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया मी स्वत: केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेडच्या राजकारणाला शरद पवार यांची फूस आहे. या बाबत बोलताना दिल्ली इथं योगायोगानं शरद पवार यांची भेट झाली. शरद पवार हे राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं आम्ही त्यांना भेटलो. त्यांनतर राष्ट्रवादीला धडकी भरली आणि १० कोटी रुपये दिल्याची अफवा उठली आहे. महाराष्ट्रानं शरद पवारांकडे राजकारणा पलीकडे पाहायला हवं, असंही गायकवाड म्हणाले. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे आज (रविवार) औरंगाबाद इथे विभागीय बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता.