राज्यात रिपाइंचे अस्तित्वच उरलेले नसल्याने महायुती जागा वाटपाबाबत टाळाटाळ करीत असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जत येथे बुधवारी सांगितले.
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले महायुतीमध्ये सामील झाले. मात्र त्यांच्या वाटय़ाच्या जागांची मागणी वारंवार करून ही भाजप व शिवसेनेचे नेते टाळाटाळ करीत आहेत. हा संदेश म्हणजे ‘देतो तेवढे घ्या अन्यथा तुमची गरज नाही’ असा आहे. जर महायुतीला रिपाइंची गरज असती, तर यापूर्वीच जागा वाटप झाले असते.
श्री. आंबेडकर यांनी सांगितले, की मोदी नावाच्या अजगरला काँग्रेस घाबरत असून लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीचीच केंद्रात सत्ता असेल. पुढील पंतप्रधान हा काँग्रेस अथवा भाजपचा नसेल मात्र या सर्वोच्च पदाचा हक्क तिसऱ्या आघाडीलाच प्राप्त होईल असे सांगून ते पुढे म्हणाले, की पुढचा पंतप्रधान प्रादेशिक पक्षाचे मुख्यमंत्रीच ठरवतील.