संसद हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीचे सरकारने व इतरांनी राजकारण करू नये. अफजल गुरूला फाशी झाली हे योग्यच झाले. परंतु सरकारने असे निर्णय घेताना वेळ लावता कामा नये, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सातारा येथे व्यक्त केले.
राज ठाकरे रविवारी सातारा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी ते  पत्रकारांशी ते बोलत होते.  ते म्हणाले की, देशात सध्या अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. त्यावरून लक्ष  दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार फाशीचे राजकारण करत आहे. लवकरच ७ ते ८ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकारण सोडून राष्ट्रहिताच्या प्रश्नावर सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.
दुष्काळी भागात मी जाण्यापेक्षा तेथे चारा-पाणी-धान्य पोहोचण्याची गरज आहे आणि या भागात दुष्काळ काय आत्ताच पडलाय काय दरवर्षी दुष्काळाचे राजकारण करणारे सत्तेत कसे जातात. निवडून कसे येतात. त्यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार काय, या विषयावर त्यांनी बोलणे टाळले.