पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोिवद व उमा पानसरे या उभयतांवरील हल्ल्याला सोमवारी एक महिना पूर्ण झाला तरी हल्ल्याच्या तपासाबाबत पोलीस फारशी प्रगती करू शकले नाहीत. पोलिसांचा निष्क्रिय तपास आणि त्याकडे पाहण्याचा शासनाचा नकारात्मक दृष्टिकोन याच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारी सायंकाळी िबदू चौक येथे निदर्शने करण्यात आली. तपासातील अपयशाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तर शिवाजी विद्यापीठामध्ये दिवंगत नेते पानसरे यांना अभिवादन करण्यात आले.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेले गोिवद व उमा पानसरे या उभयतांवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. आठवडाभराच्या उपचारानंतर पानसरे यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ात उमा पानसरे इस्पितळातून घरी परतल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून हल्लेखोराची माहिती मिळविली. मराठीत बोलणाऱ्या हल्लेखोरांनी मोरे कोठे राहतात असा पत्ता विचारत गोळीबार केला असल्याचे पानसरे यांनी पोलिसांना सांगितले. उमा पानसरे यांच्या माहितीच्या आधारे पुढील तपास करणे शक्य होईल असा दावा आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडून केला जात होता. मात्र त्यांच्याकडून माहिती घेऊनही पोलिसांना हल्लेखोरांचा मागोवा घेण्यात अपयश आले आहे.
महिनाभरानंतरही पोलीस तपास थंड राहिल्याने करवीर नगरीत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी भुरटय़ा चोरटय़ांना पकडून आणण्याऐवजी पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या सनातनी प्रवृत्तीच्या हल्लेखोरांना अटक करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी युवा नेते गिरिश खोंडे यांनी केली आहे. पोलीस तपासाच्या निषेधार्थ २० मार्च रोजी सायंकाळी शिवाजी विद्यापीठात डीवायएफआय संघटनेच्या वतीने कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, कॉ. सतिशचंद्र कांबळे यांनी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने हल्लेखोर पकडले जात नाहीत असा आरोप केला. हल्ल्याचा साक्षीदार उमा पानसरे यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरही तपास थंड का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवाजी विद्यापीठात पानसरे यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांनी शासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीतील संसदीय पध्दत टिकण्यासाठी पानसरे यांचा लढा सुरू होता. तो डोळ्यात खुपत असल्याने धर्मसंसदवाल्यांनी त्यांचा खून केला. पानसरे यांना वीरमरण आले असल्याने त्यांच्या विचाराची मशाल शेकडो तरुणांच्या हाती आली आहे. नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांचा प्रतिगामी शक्तीने खून केला तरी त्यांचा विचारांचा वारसा टिकविणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल.