गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्य़ातील तब्बल साडे सहा लाख हेक्टरवरील खरिपाची पिके संपूर्णपणे धोक्यात आली आहेत. दुष्काळात तेरावा महिना असल्यागत श्रावणातही सूर्य आग ओकू लागल्याने पिके माना टाकण्याचे किंवा करपण्याचे प्रमाण वाढले आहे. एकू णच खरीप हंगामात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाचे अति झाले आणि डोळ्यात अश्रू आले, अशी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

संपूर्ण जूनमध्ये पाऊस संपावर गेल्याने खरिपाच्या पेरण्या दीड महिना लांबल्या. पेरणीपुरता पाऊस झाल्याने पेरण्या आटोपल्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा पावसाने ओढ दिली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास खरिपाचे पिके तक धरून राहणे अशक्य आहे.
सोयाबीन, कापूस, मका, तूर या सर्वच पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाऊस अवर्षणामुळे जिल्ह्य़ातील मोठे, मध्यम, लघु, स्थानिक असे सर्वच जल प्रकल्प रिकामेच राहिले आहेत. या जलाशयांमधील पाण्याची पातळी पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत घसरली आहे. विहिरी व व्िंाधन विहिरीनी तळ गाठला आहे. सिंचनासाठी पाण्याचे स्त्रोत कुचकामी ठरले असून पावसाळ्यातच पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे.
जिल्ह्य़ातील दुष्काळ सदृश्य स्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले असतांना पीक परिस्थिती, पाणीटंचाई, रोजगार टंचाई व करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
जिल्ह्य़ातील तेरा तालुक्यांपैकी अकरा तालुक्यात पर्जन्यमान घटल्याने संपूर्ण जिल्ह्य़ातील पर्यावरण साखळी विस्कळीत झाली आहे. वन्यप्राणी व पाळीव प्राण्यांचे हाल होत आहेत. अन्न व पाण्यावाचून कासावीस झालेले वन्यप्राणी नागरी वस्त्यांकडे धाव घेत असून हल्ले करीत आहेत.
पाळीव प्राण्यांच्या चराईचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे जनावरांना साचलेले घाण पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे संसर्गजन्य साथीचे रोग वाढले आहेत. साथीच्या रोगात जिल्ह्य़ातील सुमारे तीन हजार जनावरांचे मृत्यू झाले आहेत. या माहितीला जिल्हा पशुधन अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
यावर्षी वन व सामाजिक वनिकरणाचे दोन लक्ष वृक्ष लागवडीचे उ्िद्दष्टय़ कागदावरच राहिले आहे. अपुऱ्या पावसामुळे वृक्षारोपण व संवर्धन योजना अडचणीत सापडल्या आहेत. लाखो रुपयांचा खर्च निष्फळ जाण्याची शक्यता आहे. पावसाअभावी सणासुदीच्या दिवसात बाजारपेठेतील उलाढाली मंदावल्या आहेत. त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. असे असले तरी जीवनावश्यक वस्तू व भाजीपाल्याचे भाव आभाळाला जाऊन भिडले आहेत. पाऊस नसल्याने नवीन भाजीपाल्याचे उत्पादन व आवक थांबली आहे. 

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, सेनेचा शुक्रवारी मोर्चा
जिल्ह्य़ात उशिरा व अत्यल्प पडलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे २२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन शिवसेना संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्हा शासनाने तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, गावोगावी पिण्याच्या पाण्याची व गुरांच्या चारा छावण्या सुरू कराव्या, यासह शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, यासह अन्य मागण्यांसाठी २२ ऑगस्टला खासदार प्रतापराव जाधव यांच्या जिजामाता क्रीडा संकुलातील संपर्क कार्यालयातून दुपारी १२ वाजता शिवसेनेचा भव्य मोर्चा निघून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतापराव जाधव, आमदार विजयराज शिंदे, आमदार रायमूलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, धिरज लिंगाडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे, युवासेना जिल्हाधिकारी अमरदीप देशमुख, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख करणार आहेत. तेव्हा जिल्ह्य़ातील गावागावातील शिवसेना महिला आघाडी, विद्यार्थी सेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये या मोर्चाची जाणीव जागृती करून मोर्चाला उपस्थितीत राहण्याचे आवाहन जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजेश देशमाने यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.