रत्नागिरी : वादळी पावसामुळे नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नसल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या असून संबंधित कंपनीला तत्काळ कार्यवाहीची सूचना कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुणाची शेती वाहून गेली, तर कुणाच्या शेतात पुराचे पाणी साचलेले आहे. जिल्ह्यातील साडेसातशे शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे.

त्यापैकी सुमारे अडीचशे शेतकरी रत्नागिरी तालुक्यातील आहेत. विमा परतावा देण्याचे निकष ओखी वादळाच्यावेळी सरकारकडून बदलण्यात आले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळाली होती.  यंदाही तशाच प्रकारे नुकसान झाले आहे. पण विम्याची रक्कम मिळण्यासाठी संबंधित नुकसानग्रस्त शेतीची दोन दिवसांत तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार रत्नागिरीतील शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकवर नुकसानीची माहिती देण्यासाठी प्रयत्न केला असता काहीजणांना प्रतिसाद मिळाला नाही. काही जणांना कंपनी प्रतिनिधीने, भात तसेच ठेवून द्या, आम्ही पाहून जाऊ, असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी विमा कंपनीला पत्र पाठवून तातडीने कार्यवाहीची सूचना केली आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

रत्नागिरीतील शेतकऱ्यांच्या भात पिक क्षेत्राचे १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत परतीच्या पावसामुळे शेतात जलभराव झाला आहे. कापणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान काढणी पश्चात विभागात मोडते. सध्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी काही गावात नेटवर्क नाही, तर काहींचा संपर्क झालेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडून पंचनामे कार्यवाही पूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना पत्राद्वारे केली आहे.