भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

शनिवारी दुपारी खडसे सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. खडसे म्हणाले, की मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षांपासून माझ्यावर अन्याय होत आहे. पक्षाकडून नव्हे, तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या गटाकडून माझ्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत परळी येथील सभेत काही मुद्दे सांगितले. याविषयी योग्य वेळी अधिक सविस्तर बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

खिचडी सरकार टिकणार नाही

विधानसभेत जनतेने भाजप-सेना युतीला कौल दिला होता. परंतु, सरकार स्थापन करताना दोन्ही पक्षांकडून चुका झाल्या. त्यामुळे सरकार स्थापन झाले नाही. सध्याचे सरकार हे तीन विचारांची खिचडी असून ते फार काळ टिकणार नाही, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.