खासदार राजू शेट्टींची मुक्ताफळे

नोटाबंदीच्या निर्णयाची सर्वाधिक झळ ही शेतक ऱ्यांना नव्हे, तर प्रसार माध्यमांनाच बसली आहे. कारण सगळी प्रसार माध्यमे ही काळ्या पैशावर चालतात, असे खळबळजनक विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केले.

सोलापूर जिल्ह्य़ात उजनी धरणाजवळ सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या किसान ॠणमुक्त अभियानांतर्गत आयोजित कार्यकर्ता शिबिरात शेट्टी हे आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विधान केले.

ते म्हणाले, शेतीमालाच्या किंवा भाजीपाल्याच्या घसरत्या दराला नोटाबंदीचा निर्णय जबाबदार नसून मोठय़ा प्रमाणात झालेले शेती उत्पादन जबाबदार आहे. नोटाबंदीची झळ शेतक ऱ्यांना कधीच बसली नाही, असा दावा करताना खरी झळ प्रसार माध्यमांना बसली असून सगळी प्रसार माध्यमे काळ्या पैशावर चालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नोटाबंदीच्या काळात भाजीपाल्याचे दर कोसळले तर जनतेने भाजीपाला खरेदीच केला नाही का, असा सवाल उपस्थित करीत खासदार शेट्टी यांनी आपण जनतेशी थेट संबंध असलेला पुढारी असल्याचा दावा केला. उसाचे पैसे बँेंकेतून मिळतात तसे भाजीपाल्याचे पैसे बँंकेतून जमा झाले तर बिघडले कुठे ? यामधील हवाला प्रकार बंद होईल., सर्व व्यवहार बँंकांमार्फत झाले तर त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल, असा दावाही त्यांनी केला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकांच्या अडकलेल्या पैशांमुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण ठप्प झाल्याकडे लक्ष वेधले असता खासदार शेट्टी म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकांकडे असलेल्या पैशांमध्ये हजार ते बाराशे कोटींची रक्कम बेनामी असून त्याबाबत शेतक ऱ्यांना पुढे करीत पैशाचा हिशेब दिला जात नाही. एखादी व्यवस्था बदलून दुसरी व्यवस्था सुरू करताना थोडासा त्रास होणारच आहे. जनधन योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँंक खात्याामध्ये जमा झालेला ८७ हजार कोटीचा पैसा हा काळा पैसाच आहे. या काळ्या पैशातून देशातील शेतक ऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी आपली मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कर्जमाफीसाठी देशभरातून शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण होण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्याज सवलत देण्याच्या निर्णयाशी आपण सहमतही नाही आणि समाधानीही नाही, असेही खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले.