भाजप प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण यांचे आवाहन

नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मतांच्या बदल्यात पाचशे, हजाराच्या नोटा वाटण्याचे प्रकार सर्रास घडताहेत. आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत आणि परिणामी जीवनमानही उंचावता आलेले नाही, अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीयांना या रकमा महत्त्वाच्या वाटतात. हे गरप्रकार रोखण्यासाठी प्रसारमाध्यमांसह सर्व यंत्रणांनी प्रभावी मोहीम उघडायला हवी, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.

दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे, तालुकाध्यक्ष श्रीराम इदाते आदीसह अनेक नेते उपस्थित होते.

तत्कालिन काँग्रेस सरकारच्या नियोजनशून्य धोरणामुळे शहरं बकाल झाली. दुसऱ्या बाजूला त्याचा फटका ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलाही बसला. शहरांचा विकास आराखडा तयार करताना त्यात स्वार्थ आणि राजकीय आकसाचाच विचार करण्यात आला. त्यातून अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले. त्यातही बिल्डरांना कसा फायदा होईल, याचेच धोरण राबवण्यात आले. त्यामुळे शहरांचा खऱ्या अर्थाने विकासच झाला नाही. शहरं पायाभूत सुविधांच्या समस्येमध्येच अडकून राहिली, अशी खंत व्यक्त करत श्री. चव्हाण यांनी सांगितले की, या समस्यांच्या गत्रेतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठीच भाजप सरकारने ‘स्मार्ट सिटी’ची योजना आणली आहे. शहरांचे नियोजन त्वरेने करता यावे, शहरांना विकासाच्या मार्गावर लवकरात लवकर आणावे, या हेतूने सरकारने दोन महिन्यात २७ शहरांच्या विकास आराखडय़ांना मंजुरी दिली आहे. पक्ष अभिनिवेष बाजूला ठेऊन शहरांचा विकास करणं, हे आमच्या सरकारचं धोरण आहे.

शिवसेनेच्या सरकारविरोधी भूमिकांबाबत त्यांनी सांगितले की, एका बाजूला बेजबाबदार विधानं करून सरकारच्या निर्णयावर टीका करायची आणि त्याचवेळी मांडीला मांडी लावून सत्ताही उपभोगायची. भाजपची ही संस्कृती नाही. बेजबाबदार वागणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.