परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र प्रशासन राखेच्या उघडय़ा वाहतुकीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करत नसल्याचा ठपका ठेवून औरंगाबाद प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज निर्मिती केंद्राचा उद्योग बंद का करण्यात येऊ नये, तसेच पाणी व वीज पुरवठा खंडित करण्यासंदर्भात संबंधितांना का सांगू नये अशी नोटीस बजावली आहे. वीज निर्मिती केंद्राच्या राख साठवणूक तलावातून वीटभट्टय़ांसाठी होणारी राखेची वाहतूक उघडय़ा वाहनांमधून केली जाते. शहराभोवती रस्त्याच्या बाजूने उघडय़ावरच राख साठवणूक होत असल्याने वा?ऱ्याने उडणाऱ्या राखेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या विरोधात आंदोलनही झाले होते. बीड जिल्ह्यातील परळी येथे कोळशापासून दीड हजार मेगावॅट वीज निर्मिती करणारे विद्युत केंद्र असल्याने मागील अनेक वर्षांपासून वीज निर्मिती केंद्र प्रशासन राखेपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात दुर्लक्ष करत असल्याने शहर व परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वीज निर्मिती केंद्रातून बंद पाईपातून चार किलोमीटर अंतरावरील साठवणूक तलावामध्ये राख सोडली जाते. वाळलेली राख मोफत घेऊन जाण्याची मुभा असली तरी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश आहेत. मात्र, उघडय़ा वाहनातून राखेची वाहतूक होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणालाच धोका निर्माण झाला आहे. राखेची वाहतूक करताना कोणतेच नियम पाळले जात नसल्याने नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर याची दखल घेत औरंगाबाद मंडळाचे प्रदूषण नियंत्रक डॉ.प्रवीण जोशी यांनी औष्णिक वीज निर्मिती केंद्राची यंत्रणा राखेचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याच उपाययोजना करत नसल्याचा ठपका ठेवून उद्योग बंद का करू नये, अशी नोटीसच बजावली आहे. या अनुषंगाने बीड जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा झाल्याचे जोशी यांनी सांगितले. यंत्रणा हतबल परळी औष्णिक वीज केंद्रात दगडी कोळशापासून वीज निर्मिती होत असल्याने मोठय़ा प्रमाणात राख तयार होते. वीस वर्षांपूर्वी वीज केंद्राने गंगाखेड रोडवर दीडशे एकरवर तलाव करुन पाईपलाईनद्वारे त्यात राख सोडली जाते. प्रदूषण होणार नाही यासाठी तलाव परिसरात वनराई करुन खबरदारी घेतली होती. मात्र वीज केंद्रातील राखेपासून वीट निर्मितीचे उद्योग सुरू झाल्यानंतर राख माफियांनी झाडे तोडून तलावातील राख खोदण्यास सुरुवात केली. वीटभट्टय़ांचे उद्योग वाढल्याने राख माफिया निर्माण झाले.