राज्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्तीचे असणार आहे. अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींसाठी ही हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. परीवहन आयुक्तांनी आज शविनारी या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक काढले. उच्च न्यायालयाने २००३मध्ये दिलेल्या आदेशानुसार दुचाकी वाहनचालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणारा अशा दोघांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे शासनास बंधनकारक आहे. यासाठी दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट आवश्यक आहेत. तसे निर्देशही परीवहन आयुक्तांनी उत्पादकाला दिले आहेत. दरम्यान, वाहन नोंदणी अधिकाऱ्यानेही वाहनाच्या कागपत्रांसोबत ग्राहकाला दोन हेल्मेट देण्यात आली आहेत का नाही, याची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत सर्व उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. हेल्मेटची सक्ती नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई-नागपूरसह पुण्यामध्येही केली जाईल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी सांगितले होते.