एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटी मार्फत तपास करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा आढावा घेण्यात येत असताना, केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले आहे.

हे प्रकरण एनआयकडे वर्ग होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार घाबरल्यामुळे एनआयकडे हा तपास सोपवण्यात आला असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

एनआयए ही भाजपाची नाही तर स्वतंत्र संस्था आहे. वास्तव बाहेर आले पाहिजे, प्रकाश आंबेडकर कशाला घाबरतात असे विनोद तावडे म्हणाले. राष्ट्रवादीचे दुसरे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे. हा थेट राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.