कृषी उत्पन्न बाजार समिती रेणापूरचा प्रताप

प्रदीप नणंदकर, लातूर

प्रशासनाचा कारभार पारदर्शी असला पाहिजे, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला आहे. त्याचे तंतोतंत पालन लातूर जिल्हय़ातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे. अधिकाऱ्याला दारू पाजल्याचे बिल अदा करून ते हिशेबात दाखवले आहे.

लातूर बाजार समितीचे विभाजन होऊन रेणापूर बाजार समितीची निर्मिती २५ वर्षांपूर्वी झाली. या बाजार समितीच्या व्यवहाराचे

लेखापरीक्षण दरवर्षी नियमानुसार केले जाते. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीतील लेखापरीक्षण लेखापरीक्षक सहकारी संस्था लातूर येथील पी. एस. वैद्य यांनी सादर केले असून त्यातून अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.

२८ ऑक्टोबर  २०१७ रोजी पाच हजार ५७४ रुपयांचा आकस्मिक खर्च दाखवण्यात आला आहे. त्यात पणन मंडळाचे अधिकारी मालतारण योजनेतील सोयाबीन पाहणी करण्याकरिता आले. त्यांना जेवण देण्यात आले. त्याचे बिल जोडले आहे. त्यात १८९० रुपये दारूवर खर्च झाल्याची नोंद आहे. दारूचे बिल कोणत्या नियमाने मंजूर व अदा केले, असा प्रश्न लेखापरीक्षकांनी उपस्थित केला आहे.

सभापती, उपसभापती यांनी अनेक वेळा विविध कारणांसाठी रेणापूरहून पुण्याला प्रवास गाडीने केला. त्याची जी बिले जोडली आहेत त्यात रेणापूर-पुणे जाणे-येण्याचे अंतर ८१२ किलोमीटर असताना १४९२ किलोमीटर अंतर दाखवून पसे उचलण्यात आले आहेत. बाजार समितीच्या मालकीचे कुठलेही वाहन नसताना ५० हजार रुपये इंधनावर खर्च दाखवण्यात आला आहे. कोणत्या गाडीत इंधन टाकले, कोणत्या कारणासाठी कोणी, कुठे प्रवास केला याची नोंदच नाही. जाहिराती व विविध खर्च मंजुरी न घेताच त्याचे पसे रोखीमध्ये अदा करण्यात आले आहेत.

या कालावधीत बाजार समितीचे सचिव कैलास नागुलकर होते, तर सभापती चंद्रचूड चव्हाण व उपसभापती उमाकांत खलंगरे होते. बाजार समितीचे विद्यमान उपसभापती आनंद कातळे यांनी १३ फेब्रुवारी २०१९ रोजी महाराष्ट्र कृषी पणन मंडळ – पुणे यांना सोयाबीन तारण कर्ज वाटपात झालेल्या गरव्यहाराची तक्रार दिली. पणन मंडळाने २६ एप्रिल २०१९ रोजी बाजार समिती रेणापूरच्या सचिवांना लेखी पत्र पाठवून खुलासा मागवला आहे.

सोयाबीन तारण ठेवून शेतकऱ्याला जे बाजार समितीने ७६ लाख ३९ हजार ९७७ रुपये कर्जापोटी दिले त्याची वसुली केली. मात्र, त्यापकी ७२ लाख सहा हजार रुपये पणन मंडळाकडे भरले. चार लाख ३३ हजार ९७२ रुपये पणन मंडळाकडेही भरले नाहीत व बाजार समितीच्या बँकेच्या खात्यातही दिसत नाहीत. २०१८-१९ या कालावधीतही तारण योजनेत अनेक त्रुटी आहेत. दफ्तरात नोंदी नसणे, नियमानुसार काम न करणे, बाजार समितीच्या मालकीच्या गाळेवाटपात नियमबाहय़ निर्णय घेतले गेले. कर्तव्याची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा ठपका पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी ठेवला आहे.

रेणापूर बाजार समितीत १३ मे २०१९ पासून प्रकाश जाधव हे सचिव म्हणून काम करतात. कैलास नागुलकर हे सध्या रजेवर आहेत. या बाजार समितीतील गरव्यवहाराबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.

गैरव्यवहाराची चौकशी हवी

बाजार समितीत काही चुकीचे घडले असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. गरव्यवहार करणाऱ्यांना कोणीच पाठीशी घालणार नसल्याचे सांगितले. बाजार समितीचे उपसभापती अनंत कातळे यांनी आपण स्वत: बाजार समितीतील गरव्यवहारप्रकरणी पणन मंडळाकडे लेखी तक्रार केली व त्या तक्रारीनंतर १३ मे नंतर काही दिवसांतच ६२ लाख रुपये बाजार समितीत भरले गेले. कोणाचा ताळमेळ कोणाला नाही व भोंगळ कारभार असल्याचे सांगितले. सभापती रमेश सूर्यवंशी यांनी रजेवर गेलेल्या सचिवांना बोलावून त्यांचा खुलासा मागवून दोष दुरुस्ती अहवाल पाठवला जाईल व आपल्या काळात चांगला कारभार केला जाणार असल्याचे सांगितले.

– त्र्यंबक भिसे, लातूर ग्रामीणचे आमदार

बाजार समिती बरखास्त करा

काँग्रेसच्या मंडळींनी आजपर्यंत त्यांच्या ताब्यात असणाऱ्या सहकारी संस्थांतून स्वहित जोपासण्यातच धन्यता मानली. रेणापूर बाजार समितीत घडलेला प्रकार हा त्याचाच एक भाग आहे. बाजार समिती तातडीने बरखास्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी.

-रमेश कराड, भाजपा नेते