नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे इ.स.पूर्व ५०० ते १००० च्या शतकातील बृहदाश्यमयुगीन संस्कृतीच्या ३३ एकाश्म स्मारकांचा शोध लावला असल्याचा दावा अमित भगत यांनी केला आहे. डोंगरगाव बुद्रुक येथील आढळलेल्या ३३ एकाश्म स्मारकांमुळे केवळ चंद्रपूर जिल्हय़ातील अशा शिलास्तंभांची संख्या वाढली नसून आता हे ठिकाणी महाराष्ट्रातील बहुधा सर्वाधिक एकाश्म स्मारके असणारे स्थळ झाले आहे. त्यामुळे संशोधनास नवी दिशा मिळणार असल्याचेही भगत म्हणाले. पूर्व विदर्भात इसवी सन ५०० ते १००० या काळात महापाषाणयुगीन संस्कृती होती. त्यांचे अवशेष येथे मोठय़ा प्रमाणात आढळून आले आहे. १९९७ साली पुरातत्त्व संशोधक डॉ. बोरकर यांनी चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड शहरात ९ एकाश्म स्मारक शिळा शोधल्या आहे. या शिळा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचा पुरावा होय. त्यानंतर काही पुरातत्त्व संशोधकांनी याबद्दल अधिक संशोधन करून एकूण ५ स्मारके शोधून काढली. तसेच पुरातत्त्व संशोधक डॉ. कांती पवार यांनी चिमूरजवळील हिरापूर येथे १ स्मारक शोधून काढले आहे. भगत यांनी शोधून काढलेली एकाश्म स्मारके भिन्न प्रकारची आहेत. त्यांची उंची ०.५ मी ते ३.२५ मीटपर्यंत असून रूंदी ५५ सेंमी ते १६० सेंमीपर्यंत आहे. यात दोन मुनष्याकृती असणारे शिलास्तंभ आहेत. किमान ६ शिलास्तंभ हे जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेतील आहे. ७ एकाश्म स्मारके निम्म्याहून अधिक प्रमाणात जमिनीत गाडले गेल्याचे दिसून येते. त्यातील एक हे शिलावर्तुळाच्या मध्यभागी गाडले गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. २० शिलास्तंभ हे सरळ तिरप्या दिशेत उभे आहेत. या भागातील बृहदाश्मयुगीन संस्कृतीला समांतर अशी इतिहासकालीन नागरी संस्कृती येथे नांदत असल्यााचे ठळक पुरावे पुरातत्त्व संशोधकांनी उजेडात आणले आहेत. अशोकाची राजाज्ञा कोरलेला इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील शिलालेख देवटेक येथे मिळाला आहे. देवटेक हे स्थान या स्थानापासून १५ किमी दूर आहे. तसेच पवनी हे मौर्यकाळातील सुप्रसिद्ध शहर येथून २७ किमी अंतरावर आहे. कुनघाडा येथील सातवाहन काळातील गुंफा देखील येथून केवळ ८ किमी अंतरावर असल्याने बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचेही भगत यांनी सांगितले.