‘केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.

फडणवीसांच्या याच ट्विटचा धागा पकडून अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी साधली. देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी… त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही…त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं… एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते…” असं ट्विट करत उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका केली आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग देखील केलंय.

दरम्यान, अमृता फडणवीसांच्या या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.