मुंबईतल्या अतिवृष्टीमुळे उद्धभवलेल्या घटनांसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच पाणी तुंबण्याच्या घटनेला महापालिकेला आणि सरकारला जबाबदार धरलं आहे. गदारोळानंतर १२ वाजेपर्यंत विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. ते आता सुरू झालं आहे.
मुंबईत झालेल्या पावसामुळे सगळ्या व्यवस्थेचा बोजवरा उडाला आहे. मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरच्या ट्रेन्स फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहेत. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरही ट्रेन्स उशिराने सुरू आहेत. मुंबई, मुंबई उपनगरे आणि ठाण्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहनही करण्यात आले आहे. या सगळ्या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे असं विरोधकांनी म्हणत गदारोळ घातला. त्यानंतर विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं आता चर्चेला सुरूवात झाली आहे
प्रश्नोत्तराचा तास रद्द करून मुंबईवर आलेल्या संकटावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा गटनेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहात केली. महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. अशी घटना यापूर्वी कधी घडली नव्हती. सरकारने केलेल्या अनागोंदी कारभाराचा याच्याशी संबंध आहे असा आरोपही जयंतराव पाटील यांनी केला.
याप्रकरणी ताबडतोब सभागृह स्थगित करावे व आम्ही दिलेल्या सूचनेवर चर्चा करुन प्रश्नोत्तराचा तास रद्द करावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. मुंबईवर आलेल्या या आस्मानी संकटावर आज चर्चा झाली पाहिजे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. पाहिजे तर दोन दिवस अधिवेशनाचे वाढवा परंतु या घटनेचा उहापोह झाला पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 11:50 am